ठाणे

मुख्यमंत्र्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करुन घ्यावेत – आनंद परांजपे…

ठाणे – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात स्वत:वर गोळी झाडून घेण्याचे विचार यावेत; हे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने चांगले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करुन घ्यावेत, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिला.  
 
नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बुधवारी टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. या प्रसंगी पत्रकारांनी दीपक केसरकर यांनी, बंड यशस्वी झाले नसते तर एकनाथ श़िंदे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली असती, असे विधान केले आहे, याबाबत विचारले असता आनंद परांजपे यांनी हा सल्ला दिला.  

आनंद परांजपे म्हणाले की,  दीपक केसरकर यांच्या वक्तव्यामुळे आपणालाही धक्का बसला. मुख्यमंत्री हे राजकीय विरोधक असले; त्यांच्याशी वैचारिक, सिद्धांतांची लढाई लढत असलो तरी त्यांची प्रकृती स्वस्थ राहिली पाहिजे, अशी प्रार्थना करतो. दीपक केसरकर यांनी जे वक्तव्य केले त्याकडे पाहता मुख्यमंत्र्यांच्या मनावर गद्दारी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठी खंजीर खुपसल्याचे ओझे किंवा शल्य असणार; त्यातूनच अशी भावना व्यक्त केली असणार. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नरेश म्हस्के यांना विनंती करतो की, एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन मुख्यमंत्र्यांवर उपचार करुन घ्यावेत. ठाण्यात डॉ. आनंद नाडकर्णी यांची इन्स्टीटÎूट ऑफ सायकलॉजीक हेल्थ ही जुनी आणि नामांकित संस्था आहे. त्यामाधून त्यांनी उपचार करुन घ्यावेत. कारण, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मनात अशी गोळी झाडून घेण्याची भावना यावी अन् दीपक केसरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याने ती बोलून दाखवावी, हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. त्यामुळे त्यांना एवढेच सांगेन की गेट वेल सून!

मिंधे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपल्या बुद्धीची दिवाळखोरी पुन्हा एकदा दाखवली. काल राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापन दिन होता. त्यावेळी पत्रकार परिषदेची सुरुवात करताना नरेश म्हस्के यांनी एक शेर म्हटला की, गद्दारी का जिक्र होगा जब जब, हमे किसे के पुराने किस्से याद आयेंगे. मिडीयाच्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे की, त्यांची स्मरणशक्ती कमी असेल तर त्यांनी टेलिप्रॉम्पटर ठेवावा. बोलत असताना ते वारंवार कागद बघावा लागणार नाही. मी त्यांना आज लोक माझे सांगाती हे शरद पवार यांची आत्मचरित्र भेट म्हणून पाठवत आहे. या आत्मचरित्रात शरद पवार यांचा पूर्ण जीवनपट आहे. म्हस्के यांचा राजकीय अभ्यास कमी आहे. काल नरेश म्हस्के यांनी वसंतदादा पाटील हे शरद पवार यांचे गुरु होते, असे म्हटले आहे. त्यामुळेच हे पुस्तक आपण पाठवत असून ते वाचून तरी त्यांच्या ज्ञानात भर पडेल; म्हस्के यांचे जेवढे वय आहे. त्यापेक्षा अधिक काळ शरद पवार यांनी सार्वजनिक जीवनात व्यतीत केलेली आहेत. त्यामुळे या पुस्तकाच्य वाचनातून ते काही तरी शिकतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. हे पुस्तक वाचून झाल्यानंतर त्यांना दुसरी आवृत्तीही पाठवणार आहे. गोल्डन गँगच्या म्होरक्याला शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील आणि देशाच्या विकासामधील योगदान हे कळावे, म्हणूनच हे पुस्तक पाठवत आहे.  

म्हस्के यांनी असेही म्हटले की, च़िंटू-पिंटू मिळून आंदोलन केले. त्यांना आपण सांगू इच्छितो की, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे. त्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड आणि पदाधिकाऱयांनी मिळून छातीठोकपणे आंदोलन केले.  या आंदोलनात आम्ही 50 खोके, एकदम ओक अशा घोषणा दिली. या आंदोलनात 50 खोक्यांची होळी केली. त्यानंतर पोलिसांनी आपणाला अटकही केली. त्यामुळे कोणालाही न घाबरता आंदोलन केले.  
सरकार आपल्या दारी ही योजना या आधीच्या सरकारच्या काळापासून आहेत. मात्र, या योजनांचा वापर करुन मिंधे गट आणि भाजपाच्या राजकीय फायद्यासाठी वापरल्या जात असल्याचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे. त्या योजनांचा विरोध राष्ट्रवादीने केलेला नाही, असेही परांजपे यांनी सांगितले.  

सरनाईक, फाटक, केसरकर, सामंत, सत्तार यांचा इतिहास तपासावा

कालच्या पत्रकार परिषदेत म्हस्के यांनी,  राष्ट्रवादीची स्थापनादेखील गद्दारीतून झाली, असे विधान केले. या विधानाचा समाचार घेताना परांजपे यांनी, राष्ट्रवादीची स्थापना ही शरद पवार असतील, तारीक अन्वर असतील, पी. ए. संगमा असतील. यांनी काँग्रेसमधून फारकत घेतल्यानंतर नवीन पक्षाची स्थापना केली. त्यांनी कुणाचा पक्ष, चिन्ह चोरला नाही. कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करुन स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले, असे सांगितले. राष्ट्रवादीमध्ये बाहेरुन आलेले लोक आहेत, या म्हस्के यांच्या विधानाचीही त्यांनी खिल्ली उडविली. परांजपे म्हणाले की, मिंधे गटात तरी आहेत कोण? ठाण्यातील प्रताप सरनाईक यांची राजकीय कारिकर्द कुठून सुरु झाली? रवी फाटकांचा राजकीय प्रवास काय आहे? आज मिंधे गटाच्या 9 मंत्र्यांपैकी उदय सामंत आणि दीपक केसरकर हे 2014 तर अब्दुल सत्तार हे 2019 मध्ये शिवसेनेत आणि आता मिंधे गटात आलेले आहेत. म्हणूनच नरेश म्हस्के यांनी आपली बौद्धीक दिवाळखोरी दाखवू नये. त्यांचा राजकीय अभ्यास कमी आहे.  

इंग्रजी पुस्तक पाठवणार होतो पण…!

मुख्यमंत्र्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करुन घ्यावेत – आनंद परांजपेवास्तविक पाहता आपण नरेश म्हस्के यांना शरद पवार यांचे इंग्रजी भाषेतील ON MY TERMS हे आत्मचरित्र पाठवणार होतो. या पुस्तकाच्या श्रेयनामावलीमध्ये आपलेही नाव आहे. मात्र, त्यामध्ये इंग्रजीतील अनेक अवघड शब्दांचा वापर करण्यात आला आहे. हे इंग्रजी त्यांना वाचता येईल का, आणि आले तरी समजेल का? असा प्रश्न आहे. शिवाय, जे अवघड शब्द आहेत. ते समजून घेण्यासाठी त्यांना ऑक्सफर्डचा शब्दकोष घेऊन बसावे लागेल. म्हणून त्यांना आपण मराठी भाषेतील पुस्तक पाठवत आहोत, अशा शब्दात परांजपे यांनी म्हस्के यांच्यावर कोटी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page