ठाकरे गटाचे 4 नगरसेवक नॉट-रिचेबल; पोलिसांत तक्रार दाखल…

kalyan – KDMC मधील शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित चार नगरसेवक अद्यापही ‘नॉटरीचेबल’ असल्याची माहितीपुढे आली आहे. या प्रकरणी आता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुखांनी थेट कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार अर्ज दाखल केला आहे. नॉट-रीचेबल नगरसेवकांच्या शोधासाठी अधिकृत लेखी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे कि अपहरण? याबाबत सीसीटीव्ही, कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपासाची मागणी जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी केली आहे. जिथे असाल तिथून माध्यमांसमोर या, असं सांगत वरिष्ठांच्या आदेशानंतर तक्रार दाखल केल्याचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी स्पष्टीकरण देत माहिती दिली.
पाटील म्हणाले की, कल्याण-डोंबिवली मनपामध्ये ठाकरे गटाचे ११ नगरसेवक निवडून आले. यामधील चार नगरसेवक नॉट रिचेबल झाले आहेत. आमच्या पक्षाचे नॉट रिचेबल झालेल्या नगरसेवकांची चौकशी करणे, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. सत्ताधाऱ्यांनी त्यांना पळवलेलं आहे. आमच्या चिन्हावर निवडून यायचं आणि जनतेशी प्रतारणा करणं हे कोणालाच आवडलेलं नाही. यामुळे अविश्वासाचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या मिसिंगची तक्रार आम्ही दाखल केली आहे.
त्या नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे की त्यांचं अपहरण झालंय हे आम्हालाही कळालेलं नाही आणि जनतेलाही कळालेलं नाही. घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही मिसिंगची तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आम्ही मिसिंगची तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठांशी चर्चा करुन पुढील कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे.



