डोंबिवलीत ७१ वाहन चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल…

dombivali – विरूध्द दिशेने वाहने चालवुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणा-या ७१ वाहन चालकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानपाडा चौकाकडून काटई नाक्याकडे जाणा-या वाहिनीवर रूणवाल गार्डन चौक ते मानपाडा चौकादरम्यान विरूध्द दिशेने वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांवर हि कारवाई करण्यात आली आहे.
सदर वाहनचालकांनी उद्देशपूर्वक धोकादायकरित्या, विरूध्द दिशेने सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर हयगयीने वाहने चालवुन सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर इतर व्यक्तींना त्यांच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर अटकाव करून त्यांना गैरपणे निरूध्द केल्याने तसेच इतर वाहनचालक यांना देखील विरूध्द दिशेने वाहने चालविण्यास अपप्रेरणा देऊन रस्ते सुरक्षा मानकांचा भंग केला म्हणून सदर वाहन चालकांविरूध्द मानपाडा पोलीस ठाणे गु.र.नं. १८५/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ५४, १२६(२), २८१, २८५ सह MVDR ४/१२२, १७७(अ), १८४/१७७ MVA सह रस्ता सुरक्षा मानके नियम कलम १९०(२) अन्वये वाहतुक विभागाकडून फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दरम्यान, यापुढेही कल्याण शिळ रोडवर वाहतूक नियमांचा भंग करून विरूध्द दिशेने वाहने चालवुन सार्वजनिक वाहतुकीस अडथळा करणारे वाहन चालक यांच्या विरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तरी नागरीकांनी/वाहन चालकांनी सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर विरूध्द दिशेने वाहने चालवु नयेत असे पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग ठाणे शहर यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.