डोंबिवलीत पाण्याच्या पाईपलाईन मध्ये गळती; केडीएमसीचे दुर्लक्ष?

dombivali – डोंबिवली पूर्वेतील ई प्रभाग क्षेत्रातील रिजन्सी पोलीस चौकीच्या समोर, मानपाडा मेन रोड वरती पाण्याच्या पाईपलाईन मधून पाण्याची गळती होत असल्याने त्या परिसरात मोठया प्रमाणात रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. तेथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहतूक पोलिसांना देखील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे त्रासदायक ठरत आहे. त्याठिकाणी माती साचली असून, वाहतूक संथ गतीने होत आहे. आणि याचा परिणाम तेथे फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय रस्त्यांवरील खड्ड्यात भरलेले पाणी वाहनाने उडून लोकांच्या अंगावर जात असल्याने दुचाकीस्वार आणि पायी चालत जाणाऱ्यांनी जायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
हि पाईपलाईन मागील ५ ते ६ महिन्यांपासून गळत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाचे याकडे लक्ष आहे कि नाही? इतके महिने झाले पाईप लाईन गळत आहे. म्हणजे यातून किती लिटर पाणी वाया गेले असेल? अगोदरच डोंबिवलीकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. आणि एकीकडे प्रशासन मात्र बेजबाबदारपणे वागत आहे. पाणी वाया जात असूनही केडीएमसीचे लक्ष नाही? शिवाय त्याठिकणी साचलेल्या मातीमुळे वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या रत्यावरून केडीएमसी महामंडळ, आमदार, खासदार, शासकीय कर्मचारी ये-जा करत असतात त्यांचे पण याकडे दुर्लक्ष आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. तसेच आता पाऊस सुरु झाला आहे. याचा आणखी परिणाम वाहतुकीवर होऊ शकतो. त्यामुळे केडीएमसी आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी याची तात्काळ दखल घ्यावी आणि इतके दिवस होऊनही हि पाईप लाईनची गळती का थांबवली नाही. याचा जाब संबंधित अधिकाऱ्यांना विचारून त्यांच्यावर कायदेशीर करावी तसेच या पाईपलाईनची दुरुस्ती करावी अशी आता मागणी होत आहे.