शासकीय नोकरीचे आमिष दाखवून ७० लाख रुपयांची फसवणूक…

thane – महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ७० लाख रुपये घेऊन फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. शाम विठोबा खतकर, जुगल कुमार लोडाया उर्फ लोधिया आणि रविंद्र दयानीथी शंखुआ अशी या तिघांची नावे आहेत.
माहितीनुसार, तक्रारदार दर्शन पाटील या तरुणाला शाम खतकर याने महसूल आणि वन विभागात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून त्याला मंत्रालयातील वरिष्ठ दर्जाच्या शासकीय अधिका-यांच्या नावांचे सही व शिक्के असलेले राजमुद्रा असलेली बनावट पत्रे दाखवून दर्शनकडून ७० लाख रुपये ऑनलाईन, बँकेमार्फत व रोखीने घेऊन त्याच्या नावाचे लिपिक टंकलेखक पदाचे शासकिय अधिका-याच्या सही व शिक्का असलेले बनावट नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन, त्याला नोकरीस न लावता त्याची फसवणूक केली असल्याबाबत नारपोली पोलीस ठाणे, भिवंडी येथे दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा रजि. नं. ८१४/२०२६, बीएनएस कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (२), ३३८, ३४० (२), ३४२ (१), ३४७ (२), ३५२, ३५१, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारावर शाम विठोबा खतकर, जुगल कुमार लोडाया उर्फ लोधिया आणि रविंद्र दयानीथी शंखुआ या तिघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून मंत्रालयातील विविध विभागाचे वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या नावावे सही व शिक्के असलेले बनावट शासकीय लेटर हेड व शिक्के जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, सदर आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, त्यांच्याविरुद्ध यापूर्वी शासकीय अधिकारी यांच्या नावाच्या सहया व शिक्यांचा वापर करुन नागरीकांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली असल्याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
सदरची यशस्वी कामगीरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, डॉ. श्री. पंजाबराव उगले, पोलीस सह आयुक्त, गुन्हे, ठाणे, अमरसिंह जाधव, पो.उप आयुक्त, गुन्हे, ठाणे व शेखर बागडे सहा.पो. आयुक्त, शोध-१, गुन्हे, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-२ भिवंडीचे वपोनिरी. शितल राऊत, सहा. पोलीस निरीक्षक अजय कुंभार, श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोउपनिरी. रविंद्र पाटील, सहापोउपनिरी. सुधाकर चौधरी, पोहवा सुदेश घाग, शिवाजी मुर्तडक, प्रशांत राणे, प्रकाश पाटील, साबिर शेख, निलेश बोरसे, राजेश गावडे, वसंत चौरे, शशिकांत यादव, मपोहवा माया डोंगरे, अश्विनी पाटील, दक्षता सुतार, सायली गंभेरा, पोशि / संजय चव्हाण, अमोल इंगळे, विजय कुंभार, भावेश घरत, नितीन नंदिवले, सर्फराज तडवी यांनी केली आहे.



