डोंबिवली उपविभाग वाहतूक शाखेचा अनागोंदी कारभार; वॉर्डनच्या हाती राजसत्ता…

dombivali – डोंबिवली शहरात अनेक दिवसांपासून वाहतूक शाखेचा अनागोंदी कारभार चालू असून, डोंबिवली उपविभाग वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांचे अधिकारी, कर्मचारी व वाहतुकीवर कुठलेही नियंत्रण राहिलेलं दिसत नाही. डोंबिवली शहरात अवजड वाहनांना बंदी असताना सुद्धा शहरात राजरोसपणे अवजड वाहन प्रवास करताना दिसत आहेत. आरटीओची मान्यता न घेता अनेक ठिकाणी अवैधरित्या रिक्षा स्टॅन्ड चालू केले आहे. व त्या स्टँडवरून सर्रासपणे चार ते पाच प्रवासी घेऊन जाताना दिसतात. तसेच इंदिरा चौकात वाहतूक पोलिसांसमोरच रिक्षात अवैधरित्या नको तेवढे प्रवासी राजरोसपणे भरून लोढा, पलावा, पनवेल याठिकाणी जात आहेत.
डोंबिवली पश्चिम भागातील रेती बंदर खाडीवरून अनेक रेतीच्या गाड्या जाताना दिसतात. बऱ्याचशा शाळेच्या बस कुठलेही कागदपत्र नसताना, मुलांना कोंबून – कोंबून नेताना दिसत आहे. याबाबत अनेक दिवसांपासून डोबिवली शहरातील सृजन पत्रकार युवराज सुर्ले आणि जेष्ठ पत्रकार लक्ष्मण हजारे यांनी वाहतूक शाखेशी वारंवार पाठपुरावा केला असता, संबंधित अधिकारी हे काही वार्डनची नावे सांगून त्यांना भेटण्याच्या सूचना करतात.
डोंबिवली शहरातील वाहतुकीचा कारभार हे श्रीराम पाटील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी बघत नसून येथील वार्डन बघत आहेत. आणि वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे येथील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. म्हणून आम्ही म्हणतो वाहतूक शाखेचा कारभार अधिकारी, कर्मचारी चालवत नसून, वॉर्डन चालवत आहेत. हे वार्डन नेमके आहेत तरी कोण? जर वार्डन वाहतूक शाखा चालवत असतील तर डोंबिवली शहरात वाहतुकीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज काय असा प्रश्न उपस्थित होतो.
आता तरी डोंबिवली उपविभाग वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील हे डोळे उघडून डोंबिवलीमध्ये होणाऱ्या वाहतुकीच्या समस्येवर योग्य ती उपाययोजना करून डोंबिवलीकरांची वाहतुकीतून सुटका करतील काय? आणि वार्डनच्या हाती दिलेली सत्ता आपल्या हाती घेतील का?



