पंतप्रधानांसाठी फूटपाथ मोकळे करता, सामान्यांसाठी का नाही? – हायकोर्ट

mumbai – पंतप्रधान आणि इतर व्हीव्हीआयपींसाठी रस्ते आणि पदपथ एका दिवसासाठी मोकळे केले जातात, मग सर्वसामान्यांच्या सोयीसाठी हीच गोष्ट दररोज का केली जाऊ शकत नाही असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. मोकळा फूटपाथ आणि चालण्यासाठी सुरक्षित जागा असणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि राज्य प्राधिकरणांनी ते देणे बंधनकारक आहे, असेही न्यायालयाने म्हंटले आहे.
शहरातील बेकायदा व अनधिकृत फेरीवाले व विक्रेत्यांच्या प्रश्नाची उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी स्वत:हून दखल घेतली होती. न्यायमूर्ती एम.एस.सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठापुढं त्यावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं अत्यंत परखड निरीक्षणं नोंदवली.
शहरातील फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी काय केले जाऊ शकते याचा विचार राज्य कायमस्वरूपी करू शकत नाही आणि आता काहीतरी कठोरपणे करावे लागेल असे खंडपीठाने त्यावेळी म्हटले आहे.
तसेच फूटपाथ आणि चालण्यासाठी सुरक्षित जागा हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. मुलांना आपण फूटपाथवर चालायला सांगतो, पण चालण्यासाठी फूटपाथच उरला नाही, तर मुलांना काय सांगायचं?, असा सवाल हायकोर्टाने केला. फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी काम सुरु आहे हेच उत्तर वारंवार ऐकायला मिळतं पण प्रत्यक्षात कुठलीही ठोस कृती दिसत नाही. यातून सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. इच्छा असेल, तर मार्ग नेहमीच सापडतो असे खडे बोल यावेळी हायकोर्टानं सुनावले.
दरम्यान, मुंबईसारखीच परिस्थिती कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत देखील आहे. डोंबिवलीतील रेल्वे स्टेशन परिसर, ह प्रभाग क्षेत्र, फ प्रभाग क्षेत्र, एमआयडीसी रोड समोर, मानपाडा रोड, गराडा सर्कल तसेच कल्याण पूर्व-पश्चिम परिसर या ठिकाणी सर्रासपणे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त, उपायुक्त, वॉर्ड अधिकारी, भरारी पथक यांना न जुमानता हे अतिक्रमण करणारे तसेच फेरीवाले राजरोसपणे आपला व्यवसाय अनधिकृतपणे करत आहेत.
याबाबत कित्येकवेळा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निदेर्शनास आणून देऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही. आणि जर कारवाई केलीच तर ती केवळ दाखवण्यापुरती असते. नंतर काही वेळातच परिस्थिती जैसे थे असते. त्यामुळे महानगर पालिकेचे कर्मचारी व अधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसतात. शिवाय ज्याठिकाणी भरारी पथक असते त्याठिकाणी सुद्धा हे अतिक्रमण करणारे तसेच फेरीवाले बिनधास्त बसतात.
काहीठिकाणी तर (फडके रोड, मानपाडा रोड, स्टेशन रोड) लोकांना चालणं कठीण झालं आहे. गराडा सर्कल परिसरात तर रस्त्याच्या बाजूला इतक्या हातगाड्या लावल्या आहेत कि त्याठिकाणी डबल रस्ता असूनही तेथून एकच वाहन जाऊ शकते अशी परिस्थिती आहे. तसेच जेव्हा लोकप्रतिनिधी येतात तेव्हा रस्ते ताबडतोब मोकळे केले जातात मग सर्वसामान्य कल्याण डोंबिवलीकरांसाठी हे रस्ते का मोकळे केले जात नाही? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कशाची धास्ती आहे कि हे कर्मचारी अगोदर कारवाई करतच नाही आणि केलीच तर ती केवळ दाखवण्यापुरती करतात. त्यामुळे पालिका आयुक्त, उपायुक्त, वॉर्ड अधिकारी यांनी वेळीच जागे होऊन रस्ते अतिक्रमण आणि फेरीवालामुक्त करावेत आणि लोकांना दिलासा द्यावा. अशी त्रस्त डोंबिवलीकरांची मागणी आहे.