महाराष्ट्र

अल्पवयीन मुलांकडून वाहनांचे होणारे अपघात आणि पालक…

मे महिन्यात पुण्याच्या कल्याणीनगर मध्ये घडलेले हिट अँड रन प्रकरण मध्यंतरीच्या काळात खूप गाजले. वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने नशा करून एक अपघात घडून आणला. त्या अपघातात समोरच्या दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या वाहनाला वेदांत अग्रवाल याच्या वाहनाने मागून धडक दिली. त्यानंतर पोलिसांनी वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यात दोन अन्य अल्पवयीन मुलेही होती. हे सर्व झाल्यावर वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल याला शोधून पोलिसांनी ताब्यात घेतले. विशालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांनाही काही कारणाने अटक करण्यात आली. रक्ताचा नमुना बदलला म्हणून वेदांत अग्रवालची आई शिवानी अग्रवाल हिलाही पोलिसांनी अटक केली. यावेळी ससून हॉस्पिटलच्या तीन डॉक्टरांवर कारवाई झाली. अशाप्रकारे अग्रवाल हे सर्व कुटुंब तुरुंगात गेले. आता जून महिन्यात विशाल अग्रवाल याला जामीन मिळाला आहे. पण या प्रकरणातील चौकशी सुरू आहे.

हे हिट अँड रन प्रकरण काय आहे. विशाल अग्रवाल किती मोठा बिल्डर आहे. याच्या खोलात सर्व पत्रकार बंधू-भगिनी गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला हे प्रकरण पूर्ण कळाले आहे.

परंतु यात महत्त्वाचा विषय म्हणजे पालक आपल्या अल्पवयीन मुलांना टू व्हीलर असो वा फोर व्हीलर
चालवायला का देतात? अठरा वर्ष पूर्ण झालेले नसताना वाहने हातात देणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. कारण अशा प्रकारची वाहने जर अल्पवयीन मुलांना दिली, तर ते आपल्या उत्साहात वाहने चालवतात त्यांना वाहनाचा वेग फक्त कळतो, रस्त्यावर येणारा माणूस कळत नाही. त्यामुळे असे अपघात होतात. म्हणून अल्पवयीन मुलांना वाहने देऊ नये. हा साधा शिष्टाचार पालकांना का पाळता येत नाही?
त्याचे हे प्रकरण आहे. असे इथे म्हणता येईल.

आज गाव खेड्यात मुले पंधरा-सोळा वर्षाची झाली की भावाकडून, मित्रांकडून, वडिलांकडून किंवा अन्य नातेवाईकांकडून वाहने घेऊन चालवायला घेतात. मग ते कामानिमित्त दोन-तीन गावात सहज जाऊन येतात. अशी वाहने चालवणे म्हणजे ग्रामीण जनतेच्या जीवाला धोका आहे. हे सर्वजण विसरतात. रस्त्यावर वर्दळ नाही, मग वाहन चालवले तर काही होणार नाही असा विचार त्या प्रत्येक वडीलधाऱ्याचा मित्रमंडळींचा असतो. हा विचार अत्यंत चुकीचा आहे. यामुळे अशी प्रकरणे आजकाल वाढत आहेत.

त्यातच पुण्यासारख्या आधुनिक शहरात नॅशनल, इंटरनॅशनल कंपन्या आलेल्या असल्याने. तिथे धूम्रपान, मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या संदर्भातील अनेक नवनवीन ब्रॅण्ड इथे येत असतात. वेगवेगळे अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्ज या शहरात येऊ लागले आहेत.
त्यामुळे अनेक वर्षांपासून इथे रिओ पार्टी मोठ्या प्रमाणात होत आहेत. अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुण मुलं – मुलींचे प्रमाण पुण्यात जास्त दिसू लागले आहे. हे सर्व भीतीदायक आहे. कारण अंमली पदार्थ सेवन केल्यामुळे माणूस माणूस राहत नाही. मद्यपान, धूम्रपान यापेक्षाही भयानक व्यसन अंमली पदार्थांचे असते. त्यातून माणसाला सहजासहजी बाहेर पडता येत नाही. अशा लोकांना व्यसनमुक्ती सुधार गृहत ठेवावे लागते. त्यावेळी त्यांच्यावर अनेक प्रयत्न करावे लागतात तेव्हा कुठे या व्यसनातून त्यांची मुक्तता होते.

मध्यंतरीच्या काळात मुंबई शहरातही अंमली पदार्थांचे एक प्रकरण उफाळलेले होते. प्रत्येक शहरात, गावात हे अंमली पदार्थ पोहोचलेले आहेत. यावर केंद्र सरकारने व राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे. मनातील उत्साही स्वभाव आणि कामाचा, अभ्यासाचा ताण-तणाव यामुळे मुले, मुली अशा प्रकारच्या व्यसनाकडे वळत आहेत. यावर बंदी घालण्याची वेळ आलेली आहे. यामुळे पुण्यातील हिट अँड रन प्रकरण घडलेले आहे. या प्रकरणातील पालक-आरोपींना योग्य ती शिक्षा होईल परंतु या शिक्षेनंतर अशी प्रकरणे बंद होतील का? हाच खरा प्रश्न आहे. मृत्यू पावलेल्या माणसांच्या नातेवाईकांचे अशा शिक्षेमुळे समाधान होईल का? कारण त्यांच्या जीवाभावाचा एक व्यक्ती, माणूस कायमस्वरूपी त्यांच्यातून निघून जातो. हे दुःख सर्वात मोठे आहे. हे दुःख माणूस म्हणून प्रत्येकाने आधीच जाणले पाहिजे. मग असे अपघात पुढे होणार नाहीत.

अशी प्रकरणे रोखण्याकरता पालकांनी आपल्या मुलांकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. आपली मुले मित्रांच्या संगतीत.
काय करतात, कुठे जातात. हे सर्व पालकांनी जाणून घ्यावे. आपली मुले मित्रांसोबत गेल्यावर कोणत्याही प्रकारे व्यसन तर करत नाहीत ना? याकडे त्यांनी पाहिले पाहिजे.

पालकांनी जबाबदारीने या गोष्टींकडे लक्ष दिले तर नक्कीच मुलांना एक प्रकारे धाक राहील शिवाय आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टींकडे आपल्या पालकांचे आपल्याकडे लक्ष आहे याची जाणीव मुलांना राहील. शिवाय मुलांना लागलेले मद्यपान, धूम्रपान अंमली पदार्थांचे व्यसन रोखण्याकरता पालकांना प्रयत्न करता येतील. परंतु अशा घटना ज्यावेळी घडतात त्यावेळी अशा मुलांच्या पालकांचे आपल्या पाल्याकडे लक्ष आहे कि नाही असा प्रश्न निर्माण होतो. किंवा मग व्यसन करणे असो वा ड्रायव्हिंग करणे याला पालकांची कुठेतरी संमती आहे का? हाहि एक प्रश्न उदभवतो. दरम्यान, अशा घडणाऱ्या घटना पाहता पालकांनी मुलांची काळजी घेतली पाहिजे.

शिवाय पोलिसांनी देखील अशा घडणाऱ्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे वेळीवेळी उपाययोजना असेल किंवा घडणाऱ्या घटनांविरोधात कायद्याची अंमलबजावणी कठोरात कठोर केली पाहिजे. कोणत्याही, कोणाच्याही दबावाला बळी न पडता संबंधित दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे. कारण यात भारत देशाचे कल्याण आहे. आजची युवा पिढी भारताला विकसित करणार आहे. हीच पिढी जर व्यसन करणार असेल तर आपल्या भारताचे नुकसानच आहे. याचा विचार संपूर्ण प्रशासनाने करावा. पुणे शहर हे पूर्वांपार परंपरेने विद्येचे माहेरघर राहिले आहे पण या विद्येच्या माहेर घरात अंमली पदार्थ सहज विकले जात आहेत. त्यामुळे पुणे शहरातील युवा पिढी या व्यसनात संपूर्णपणे डुबत चालली आहे का? कारण दर दिवशी कुठे ना कुठे या संदर्भातील बातम्या येतात. अशा घटनांमुळे पुणे शहर दानवशक्तीचे माहेर घर झाल्यासारखे वाटत आहे. बरं अशी प्रकरणे एकट्या पुण्यातच होत नाहीत तर अन्य शहरातही होत आहेत. एकदंरीत महाराष्ट्रात वाढणारे अपघात आणि अंमली पदार्थांचे सेवन हे कुठेतरी थांबले पाहिजे. नाहीतर अख्खीच्या-आख्खी पिढी बर्बाद होईल.
त्यामुळे हे सर्व थांबवण्यासाठी आता प्रामाणिकपणे कडक शासन झाले पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page