पाकिस्तानवर हवाई हल्ला…

national – भारताने पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधे राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मधे दहशतवाद्यांचे ९ तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्री, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिल्लीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पहाटे १ वाजून ५ मिनिटांनी सुरु झालेली ही मोहीम दीड वाजता संपली. गेली ३० वर्षं पाकिस्ताननं पुरवलेल्या पायाभूत सुविधांच्या आधारे इथं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्तीला किंवा लष्करी आस्थापनांना धक्का न लावता ही मोहीम फत्ते झाल्याचं त्यांनी सांगितलं. या कारवाईतून पाकिस्तानचे दहशतवादाशी लागेबांधे उघड झाले असल्याचं विक्रम मिस्री म्हणाले. या मोहिमेबाबात माहिती देणारं दृक्श्राव्य सादरीकरण या पत्रकारपरिषदेत देण्यात आलं.
माहितीनुसार, भारतानं सवाई नाला कॅम्प (मुझफ्फराबाद), सय्यद ना बिलाल कॅम्प (मुझफ्फराबाद), गुलफूर कॅम्प (कोटली), बरनाला कॅम्प (भिमबर), अब्बास कॅम्प (कोटली) या पाकव्याप्त भागात कारवाई केली.
याशिवाय सरजल कॅम्प (सियालकोट), मेहमुना जोया कॅम्प (सियालकोट), मरकझ तोयबा (मुरीदके), मरकझ सुभानअल्लाह (भवलपूर) या पाकिस्तानातील ठिकाणांना लक्ष्य केलं.