Kalyan-dombivali : सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी…

kalyan – राज्यात पावसाचा जोर वाढला असून, ठाणे जिल्ह्यात उद्या ४ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) शिक्षण विभागाने देखील शनिवार, ४ जुलै रोजी केडीएमसी हद्दीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
हा निर्णय राज्य मंडळ, CBSE, ICSE, CIE तसेच अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित सर्व शाळा व महाविद्यालयांना लागू राहणार आहे.

याबाबत केडीएमसीने परिपत्रक जारी केले असून, त्यात प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून दि.०१/०७/२०२६ रोजी प्राप्त हवामान अंदाजानुसार ठाणे जिल्हयात दि.०१/०७/२०२६ ते दि.०३/०७/२०२६ या कालावधीत ऑरेज अलर्ट, दि.०४/०७/२०२६ रोजी रेड अलर्ट व दि.०५/०७/२०२६ रोजी ऑरेज अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे असे म्हटले आहे.
सदर कालावधीत अतिवृष्टी, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट तसेच काही भागांत पाणी साचणे, पुरपरिस्थिती निर्माण होणे किंवा वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शनिवार दि.०४/०७/२०२६ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या (राज्य मंडळ, सी.बी.एस.ई, आय.सी.एस.ई. सी. आयई) प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व महाविदयालयांना सुट्टी जाहिर करण्यात येत आहे.
तसेच महाविदयालय व शाळा व्यवस्थापनाने यापुढील कालावधीत परिस्थितीचा विचार करुन विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सुरक्षिततेस धोका निर्माण होणार नाही याबाबत योग्य त्या उपाययोजना करावयाच्या आहेत.



