आज अनंत चतुर्दशी; गुलाल उधळत बाप्पाला निरोप!…

mumbai – आज अनंत चतुर्दशी, गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. गेल्या दहा दिवसांत गणरायाच्या आगमनाने घराघरांत आनंदाचे, भक्ती आणि उत्साहाचे वातावारण होते. दररोजच्या आरती, पूजा, नैवेद्य व गजरांनी वातावरण मंगलमय झाले होते.
मात्र आज लाडक्या गणरायांना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाणार आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील सार्वजनिक मंडळांसह, घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे.
ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत मुंबईतील गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरु झालेली आहे. लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. तसेच मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेने जय्यत तयारी करत नियंत्रणासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
तर पुण्यात देखील पारंपरिक वाद्यांच्या निनादात, ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे.
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा घोषणा देत राज्यातील मानाचे गणपती, विविध मंडळे, आणि नागरीक आज बाप्पाला निरोप देणार आहेत.