अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले…

जालना – मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून फळांचा रस पिऊन १७ व्या दिवशी उपोषण सोडले. त्यावेळी मुख्यमंत्री आणि जरांगे-पाटील यांच्यात काही काळ चर्चा झाली त्यानंतर त्यांनी उपोषण सोडले.

दरम्यान, उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील म्हणाले की, शिंदेसाहेब न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी आज समोर येऊन सिद्ध केले. मी भारावून न जाता आरक्षणाच्या प्रश्नासाठी शिंदे साहेबांच्या मागेच लागणार. आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शिंदे साहेब येणार म्हटले आणि मी ही त्यांना आणून दाखवले. मी आरक्षणाबाबत मागे हटणार नाही शिंदे साहेबांना हटू देणार नाही.