दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार…

मुंबई – ठाकरे गटातील दिपाली सय्यद यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले आहे.
दिपाली सय्यद यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हि घोषणा केली. येत्या तीन दिवसांवर माझा प्रवेश आहे. त्यामुळे कधी आणि किती वाजता प्रवेश करायचा. कुठे प्रवेश होईल, याची चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले, असं दिपाली सय्यद यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे, नीलम गोऱ्हे यांच्यावरही टीका केली.
रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील खोके मातोश्रीवर येणं बंद झाल्याची मोठी खंत आहे. निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे या चिल्लर आहेत. रश्मी ठाकरे खऱ्या सूत्रधार आहेत,असा गंभीर आरोप दिपाली सय्यद यांनी केला आहे.
संजय राऊतांना आपल्या पापाची शिक्षा झाली. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो याचे ते उत्तम उदाहरण आहे. त्याच्यामुळे या गोष्टी घडत गेल्या असून दोन वेगळे गट झाले आहेत. एकनाथ शिंदेंनीच मला शिवसेनेत आणले असल्याने त्यांच्या पाठीशी उभं राहणं माझं कर्तव्य आहे.
राजकारणात प्रत्येकजण आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी येत असतो. पण जर काही कारणांमुळे पक्ष फुटत असेल तर मग आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, काम कऱण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. ज्या व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्यासोबत गेलं पाहिजे, असं दिपाली सय्यद यांनी सांगितलं.
खोके म्हटलं जात आहे, त्यामागील खरं राजकारण समोर आलं पाहिजे. तसंच मुंबई महापालिका नेमकी कोणाच्या ताब्यात आहे हेदेखील कळलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं.