‘बेस्ट’ च्या ताफ्यात पर्यावरणस्नेही १५० बस सामील…

mumbai – ‘बेस्ट’च्या ताफ्यात भविष्यात 100 टक्के पर्यावरणस्नेही बसेस असणार आहेत त्यापैकी 150 बस देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाची सोय करतानाच या नवीन पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसेसमुळे पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे. ‘बेस्ट’ ही मुंबईची जीवनवाहिनी असून उपनगरीय लोकल रेल्वे, मेट्रो ट्रेन यांना प्रवाशांशी जोडण्यासाठी बस सेवा महत्त्वाची आहे. या बसेसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (BEST)च्या कुलाबा येथील आगारात मुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते 150 नवीन इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, अतिरिक्त महाव्यवस्थापक आर. आर. डुबल व ए.एस. राव , मुख्य अभियंता राजन गंदेवार, मुख्य वाहतूक व्यवस्थापक रमेश मडावी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने 5 हजार बसेस घेण्याचा निर्णय पूर्वीच झाला आहे. त्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई वन ॲपच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी ‘सिंगल तिकीट सिस्टीम’ आणण्यात आली आहे. प्रवासी भाड्याचे उत्पन्न जास्त असेल तर बेस्ट आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. यासाठी हे उत्पन्न जास्तीत जास्त वाढविण्यासाठी काम केले जावे, अधिक व्यावसायिक दृष्टिकोन आणला जावा. ‘बेस्ट’ सक्षमीकरणासाठी राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका तत्पर आहेच, असा आश्वासक दिलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा मार्फत एकूण 150 नवीन 12 मीटन लांबीच्या संपूर्णपणे इलेक्ट्रिक बसगाड्या प्रवर्तित होत आहेत. या बसगाड्या ‘वेट लीज’ पद्धतीने चालविल्या जाणार असून, त्यामुळे मुंबईतील पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
150 इलेक्ट्रिक बसगाड्या मुंबईतील 21 मार्गावर चालविण्यात येणार आहेत, ज्यामध्ये 21 प्रभागांचा समावेश आहे. बसगाड्यांची गुणवत्ता नियंत्रण केंद्राद्वारे नियमित देखरेख केली जाईल.
ही बससेवा अंधेरी (प.), जोगेश्वरी (प.), कुर्ला (पूर्व व पश्चिम), बांद्रा (प.), कांदिवली (प.) आणि बोरिवली (प.) या उपनगरी रेल्वे स्थानकांशी जोडली जाणार आहे.
या बसगाड्या मेट्रो लाईन क्र. 1,2A, 7 आणि 3 (अॅक्वा लाईन) या प्रमुख मेट्रो मार्गाशी जोडणी साधून मेट्रो प्रवाशांना अखंड शेवटच्या टप्प्यापर्यतची जोडणी उपलब्ध करून देतील.



