महाराष्ट्रात आज पासून ई-बाँड प्रणाली सुरू…

mumbai – महाराष्ट्रात आजपासून इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली.
महाराष्ट्राच्या इतिहासांत पहिल्यांदाच नोंदणी आणि मुद्रांक विभाग ई-बॉण्ड (E-Bond) सुरु करत आहे. ई प्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला ‘स्टॅम्प पेपर’ न घेता, म्हणजे स्टॅम्प पेपरची गरज नाही, ई-बॉण्डवर तुम्ही ‘स्टॅम्प पेपर’ घेऊ शकता. राज्यातील हा सर्वात मोठा निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील आमचं सरकार आता ई-बॉण्डवर आलेलं आहे. त्यामुळे या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राज्य शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत, National E-Governance Services Limited (NeSL) आणि National Informatics Centre (NIC) यांच्या तांत्रिक सहाय्याने या नव्या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे कागदी बॉंडची झंझट संपून सर्व प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे.
आयातदार आणि निर्यातदारांना विविध व्यवहारांसाठी वेगवेगळे कागदी बॉंड देण्याची गरज राहणार नाही. एकाच इलेक्ट्रॉनिक बॉंडद्वारे प्रोव्हिजनल असेसमेंट्स, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स, वेअरहाऊसिंग, आणि मॅन्युफॅक्चरिंग इन बॉन्डेड वेअरहाऊसेस अशा सर्व प्रक्रिया पूर्ण करता येतील.या ई-बाँडची निर्मिती ICEGATE पोर्टलवर होणार असून, NeSL च्या माध्यमातून ई-स्टॅम्पिंग आणि ई-स्वाक्षरी केली जाईल. कस्टम अधिकारी ऑनलाईन पडताळणी करतील. त्यामुळे फसवणुकीस आळा बसणार असून प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
राज्य शासनाने 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कागदी स्टॅम्पची आवश्यकता पूर्णपणे संपेल. या नव्या उपक्रमामुळे सीमाशुल्क प्रक्रिया गतिमान, व्यवसाय सुलभ, आणि डिजिटल इंडिया तसेच Ease of Doing Business उपक्रमांना चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक आणि कागदरहित प्रशासनाच्या दिशेने हे एक ‘ग्रीन गव्हर्नन्स’चे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.