नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी…

mumbai – नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (२९ सप्टेंबर), अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी (१ ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजल्या पासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे.
अटी व बंधने…
परवानगी मिळालेल्या कालावधीत ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल.
उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात ही परवानगी लागू होणार नाही.
ध्वनी प्रदूषण नियम, २००० मधील नियम ३ व ४ चे पालन करणे आवश्यक राहील.
तक्रारी आल्यास ध्वनी प्राधिकरणाला पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत कार्यवाही करण्याचा अधिकार राहील.
आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
हा आदेश मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (mumbaisuburban.gov.in) प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नवरात्रोत्सवातील सप्तमी, अष्टमी व नवमी या तीन दिवसांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे, मात्र ठरवलेल्या मर्यादा आणि अटींचे पालन करणे बंधनकारक असेल, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आदेशाद्वारे कळविले आहे.