भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा – मंत्री सरनाईक…

mumbai – भाडेतत्त्वावर ५,१५० इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याची जबाबदारी असलेली कंपनी निष्क्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे, एसटी महामंडळाने या कंपनीसोबत केलेला निविदा करार रद्द करण्याची कारवाई करावी, असे निर्देश परिवहन मंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महामंडळ मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.

२२ मे पर्यंत संबंधित बस पुरवठादार संस्थेला १ हजार बसेस पुरवठा करण्याचे सुधारित वेळापत्रक दिले होते. परंतु या कालावधीपर्यंत एकही बस संबंधित कंपनीला पुरविणे शक्य झाले नाही. त्यामुळे भविष्यात या संस्थेकडून बसेस पुरवठा करण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे कंपनी सोबत केलेला निविदा करार रद्द करावा, असे सरनाईक यांनी सांगितले.
सध्या एसटी महामंडळाकडे चालनात असलेल्या शिवशाही बसेसची टप्प्या टप्प्याने पुनर्बांधणी करून त्याचे रूपांतर हिरकणी (निम आराम) बसेसमध्ये करण्यात यावे. तसेच त्या बसेस पूर्वीप्रमाणे हिरव्या पांढऱ्या रंगातच असाव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.
तसेच मंत्री म्हणून राज्यातील विविध बसस्थानकाला भेट दिली असता, स्वच्छतेबाबत प्रचंड अनास्था दिसून आली. या संदर्भात प्रवाशांच्या विशेषतः महिला प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्रुटी दाखवून दिल्यानंतर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करणे अपेक्षित असताना अशा अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जात असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा बैठकीत दिला.